रविवार, ऑक्टोबर १५, २००६

बालकवि

माझे सर्वांत आवडते कवि कोण, हा एक गहन प्रश्न आहे. शाळेत असताना, ज्या कविता समजायला सोप्या (आणि अर्थातच, ज्यातले संदर्भासहित स्पष्टीकरण करायला सोपे!) त्या कवितांचे कवि माझे आवडते असायचे. मग दर वर्षी ते बदलायचे, कुसुमाग्रज दर एक वर्षाआड आवडते बनायचे, अनंत फंदिंचे 'फटके' सुद्धा जाम आवडून जायचे. संत कवि, त्या न्यायाने मला कधीच फारसे जवळचे वाटले नाहीत. एक तर त्यांची भाषा ब~यापैकी जुनी - आणि त्यातून उदाहरणे दिलेली जरा जडच जायची. पाठ्यपुस्तकातल्या सा~या कविंपैकी मला सतत जवळचे वाटत आलेले श्रेष्ठ कवि म्हणजे, आपले बालकवि. एकतर त्यांच्या नावातच 'बाल' असल्यामुळे लहानपणापासूनच एक प्रकारची विशेष मैत्री वाटायची. बालकविंची कविता समजायला सोपी, पाठ करायला सोपी! पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे क्षणांत डोळ्यासमोर निसर्ग उभा राहत असल्यामुळे ती केवळ "सविस्तर उत्तरे लिहा (आणि विसरा)" type ची कविता मुळीच वाटायची नाही. पाहिजे तेवढे सविस्तर उत्तर अगदी हसत खेळत लिहू शकू अशी त्याची कविता!

तो बालपणिचा काळ मुख्यतः पाठ्यपुस्तकातल्या कवितांचा असल्यामुळे कवि आवडता होण्यामागची कारणेही थोडीशी 'पाठ्य' स्वरूपातलीच होती. आता पुन्हा त्या सगळ्या कविता वाचतो तेव्हा (आता उत्तरे लिहायची नसतात) तीच कविता आणखी वेगळी वाटायला लागते, प्रत्येक नवं वाचन त्या कवितेचं आणखी नवं रूप दाखवून जातं. त्याची मजा काही औरच. वेळ बदलते, संदर्भ बदलतात आणि तेच शब्द नवं काहितरी देऊन जातात. गद्य वाचनानंतरही असा अनुभव येतोच; पण पद्य वाचानानंतरचा नवा अनुभव अधिक परीणामकारक वाटतो.

बालकविंच्या कवितेबद्द्ल किती लिहावं!
"थबथबली ... ओथंबून खाली आली.
जलदाली ... दिसली सायंकाली."

केवळ सात शब्दांत आषाढ उभा करण्याचं सामर्थ्य आहे या शब्दांत.

"मधु मोती ... भूवर भरभर ओती" असं म्हणत, कवितेतला पाऊसच नव्हे तर प्रत्यक्ष कविताच अक्षरशः बरसते.

असं पावसाचं वर्णन असो वा नितांतसुंदर, लाज~या फुलराणीचं,
तो रविकर का गोजिरवाणा - आवडला अमुच्या राणींना?
लाजलाजली या वचनांनी - साधी भोळी ती फुलराणी!
निसर्गसौंदऱ्याचं त्या निसर्गापेक्षाही सुंदर असं वर्णन वाचत रहावं; आणि पुनःपुनः वाचत रहावं.
पायवाट पांढरी तयांतुनि आडवीतिडवी पडे;
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे
असे शब्द उच्चारले, की पाय टाकुनि जळात बसलेल्या औदुंबराकडे जायची हिरवी वाट हुबेहूब दिसायला लागते.
गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी!
काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी?
काय हरवले? नव्हे, गवसले ते निव्वळ सोने!

संध्याकाळ सरत आलेली, रात्रीच्या प्रवेशाचा समय झालेला, अशा वेळी,

आली होती भरती आता अस्तसमुद्राला
त्या लाटांतुन काय सांडल्या या मौक्तिकमाला!
कल्पतरुची फुले उडाली की वाऱ्यावरती?
आकाशीच्या गंगेला की बुदबुद हे येती?
नवटिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे?
स्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे?
विश्वशिरावर टोप चढविला हिऱ्यामाणकांचा!
मंगल, मंगल जिकडे तिकडे जय मांगल्याचा.
अशी संध्याकाळ फक्त बालकविंनाच दिसो जाणे. अशी कितीतरी हिरेमाणके बालकविंनी घडवून ठेवली आहेत. किती वेचावीत; आणि किती वेळा! माझी झोळी रिकामीच राहणार की काय असे वाटत राहते.

श्रावणमासी बद्दल मी आधीही लिहिलं होतं. वदनी अपुल्या वाचुन घ्यावे असे ते बालकविंचे श्रावण महिन्याचे अविस्मरणीय गीत.

'मधुयामिनी' ही कविता पुढे लिहून आजचं लिखाण पुरं करतो.
मधुयामिनी नील लता
हो गगनी कुसुमयुता
धवलीत करि पवनपथा
कौमुदि मधु मंगला

दिव्य शांती चंद्रकरी
आंदोलित नील सरी
गिरिगिरिवरी तरुतरुवरि
पसरी नव भू तिला -

सुप्रसन्न, पुण्य, शांत
रामण्यकभरित धौत
या मंगल मोहनात
विश्वगोल रंगला

'खेड्यातली रात्र' ही खुणावतेय, पण ती पुन्हा कधितरी...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: