मंगळवार, फेब्रुवारी २१, २००६

वाढता असंतोष की वाढत्या अपेक्षा?

हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तुमच्या मतांचे स्वागतच आहे.

एका महिन्यापूर्वी मी BSNL या भारतातल्या सर्वांत मोठ्या telecommunication कंपनीकडे broadband साठी अर्ज केला होता. त्यानंतर त्याआधीचा telephone line चा (वाईट) अनुभव मनात ताजा असल्यामुळे या अर्जाचा अगदी पुरेपूर पाठपुरावा मी केलेला आहे. गेल्या शनिवारी जेव्हा BSNL ची मंडळी modem बसवून गेली तेव्हा मला आशेचा किरण दिसला; पण तो फारच अल्पजीवी ठरला. सगळं काही आता आहे - telephone line (जिवंत) आहे, घरी computer आहे, broadband चे अत्याधुनिक modem आहे, पण काहिही उपयोग नाही. मला अजून username आणि password काही त्यांनी दिलेला नाही. जाताना ही मंडळी पैसे (लाच) मागण्याआधी मोठ्या आवाजात सांगून गेली, "आमचे साहेब स्वतः तुम्हाला password घरपोच आणून देतील संध्याकाळी". मी पैसे देत नाही असं दिसल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा राग मला चांगलाच दिसत होता, पण त्यांनी telephone line लावून देण्याचे अनंत उपकार केल्यानंतर मी पैसे दिले होतेच, आता यावेळी अजून लाड नाहीत. असो.

आज त्या गोष्टीला दोन दिवस होऊन गेले, अजूनही त्यांचा "साहेब" उगवलेला नाही. तो फोनही उचलत नाही. अशा वेळी काय करायचे सांगा?

शिक्षणाने माणूस सम्रुध्द होतो, त्यास विचार करण्याची क्षमता प्राप्त होते, हे सर्वमान्य आहे. शिक्षणाने माणसाचा आणि एकंदरीतच समाजाचा विकास होत असतो. त्यातूनच नवे तंत्र, गोष्टी करण्याचे नवे मार्ग पुढे येत असतात. दहा वर्षांपूर्वी जी गोष्ट करत होतो, त्याच प्रकारे आजही करत बसलो तर त्यात कसला म्हणायचा विकास? स्वतःचा आणि समाजाचाही.

त्याचबरोबर असाही प्रश्न पुढे येतो की या शिक्षणामुळे आपण अवास्तव अपेक्षा ठेवायला लागलो आहोत का? उच्च शिक्षणामुळे मिळालेल्या ज्ञानामुळे कित्येक गोष्टी अधिक चांगल्या पध्दतीने करता येतील असं मला दिसतं. पण ते जेव्हा घडत नाही, आणि केवळ एखाद-दुसऱ्या बाबतीत नाही तर जागोजागी, तेव्हा एक प्रकारचा असंतोष मला खायला उठतो. यात चूक काय - की अशा (अवाजवी) अपेक्षा ठेवणंच बरोबर नाही?

BSNL हे फक्त निमित्त झालं - रिक्षावाला ते भाजीवाला, आणि BSNL ते बस महामंडळ कुठेही बघतो तेव्हा मला असा असंतोष जाणवतो. आपण मोठ्या नम्रतेने वगैरे वागावं तर तो समोरचा आपल्याला हाड-हूड करणार, मग आपण तरी ते का ऐकून घ्यावं? मग असा असंतोष वाढतच जातो...

तुम्हांसही असे अनुभव नक्कीच आले असतील. या सगळ्यातून मार्ग काय? Win-win situation पर्यंत कसे पोहोचता येईल?

की "(या देशात) हे असेच चालणार, आपल्या हातात कितीही म्हटलं तरी काहीच नसतं" असं म्हणून मनातल्या मनात एखादी शिवी हासडून सगळं सोडून द्यायचं?

वाढता असंतोष आणि वाढत्य अपेक्षा या अशा प्रकारे linked आहेत का? असणं योग्य आहे का?


सुरूवातीला म्हणालो त्याप्रमाणे, हा माझा स्वतःचा अनुभव झाला. तुमच्या मतांचे स्वागतच आहे.

४ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
Ajit म्हणाले...

प्रिय मित्र,

आपला अभिप्राय वाचून चांगले वाटले.

आपण आपले खरे नाव लिहिले असते तर आवडले असते. ही माझी नेहमीचीच policy आहे. मी अनामिक प्रतिसाद ऐकून घेणार नाही. मग तो प्रतिसाद उत्तेजनाचा असो वा टीकेचा. धन्यवाद.

Sumedha म्हणाले...

फक्‍त सार्वजनिक सेवांच्या बाबतीतच नाही, तर कित्येक वैयक्‍त्तिक बाबतीतही हे खरे आहे की अधिक अपेक्षा अधिक असंतोषाला जन्म देते, देउ शकते. पण त्याच बरोबर अधिक असंतोष अधिक क्रियाशीलतेला जन्म देतो, देउ शकतो! हा प्रश्न विचारणे देखील महत्त्वाचे आहे की अपेक्षा "अवाजवी" ठरते आहे का? अपेक्षा दडपून असंतोषही दडपणे, आणि कधीतरी त्याचा स्फोट होउ देणे, किंवा तो असंतोष योग्य मार्गी वळवणे हे दोनच पर्याय राहतात. इथे अपेक्षा दडपणे आणि आहे ती परिस्थिती स्वीकारून कमी अपेक्षा ठेवणे यात फरक आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे.

पण तुम्ही दिलेल्या उदाहरणांमधे असंतोष योग्य मार्गी कसा लावायचा, हा अवघड प्रश्न उरतोच. कारण असंतोष जिथे निर्माण होतो आणि जिथे क्रियाशीलतेवर परिणम व्हायला पाहिजे ती ठिकाणे भिन्न आहेत, म्हणजे मग, त्या दोन ठिकाणांमधे संवाद ही सुरुवात होउ शकते का?

माझे 2 पैसे, टीका किंवा उत्तेजन नाही, पण अधिक प्रश्न :-)

अनामित म्हणाले...
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.