गुरुवार, जुलै ०२, २००९

एका सेतूची नामकहाणी

अडवाणीजींनी भेट दिलेल्या आपल्या (१९९२ सालच्या, किरकिरत्या टोयोटा) अग्निरथातून स्वा. सावरकर चालले होते. सकाळी अडवाणींसोबत "रामसेतूचे सांस्कृतिक महत्त्व आणि चिंतन" ही चर्चा चांगलीच रंगली होती, तेच विचार अजून त्यांच्या मनात घोळत होते. तेवढ्यात वरळी नाक्याच्या ट्रॅफिकच्या कोलाहलामुळे ते एकदम बिचकले -
"काय हो चालक - स्वातंत्र्य मिळून बरीच वर्षं झाली ना? अजूनही चळवळी चालूच? एवढी कसली गर्दी जमली आहे?"
"क्या साब... पहली बार बंबई आये लगता है. इसको ट्रॅफिक बोल्ते है. रोज का मामलाये"
तेवढ्यात अचानक शिवसैनिकांचा एक मोर्चा आला - "हिंदुह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांनी जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्राचे सुपुत्र, स्वतंत्रता संग्रामाचे सेनानी स्वा. सावरकर ह्यांचेच नाव समुद्रसेतूला द्यायला हवे". आधीचा तासभर विविध सोम्या-गोम्यांच्या (आणि त्यांच्या काकांच्या) वाढदिवसाचे, पक्षांतर्गत नेमणुकांचे आणि दहावी उत्तीर्णांच्या अभिनंदनाचे फलक पाहून हबकलेल्या सावरकरांना एकविसाव्या शतकातील महाराष्ट्रातदेखील आपल्या नावाचा उच्चार झाल्याचे ऐकून मोद झाला. हे हिंदुह्रुदयसम्राट आणि त्यांचे सुपुत्र ह्यांची ताबड्तोब भेट घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ते चालकाला म्हणाले,
"अहो हे हिंदुह्रुदयसम्राट कुठे राहतात?"
"वो तो बांद्रा मैं रहते साब..... उधर जाना क्या?"
"हो. ताबडतोब भेटलेच पाहिजे त्यांना!"
"ट्रॅफिक बहुत रहता है साब - सावरकर रोड पे, शिवाजी पार्क के पास."
आपल्या नावाचा रस्तादेखील आहे हे ऐकून खूष झालेले स्वातंत्र्यवीर तिथेही खोळंबा असल्याचे ऐकून थोडे वैतागले.
"आप बोले तो नये ब्रिज से ले लूं? पचास रुपया ज्यादा लगेगा"
ब्रिज म्हणजे बहुदा तोच घोषणांतला समुद्रसेतू असावा असे त्यांनी ताडले.
"एकदम नया है, दस साल से बन रहा है"
पन्नास रुपये ही अंमळ जास्तच रक्कम असली तरी वेळ वाचेल म्हणून त्यांनी गाडी तिकडे वळवायला सांगितले.

समुद्रसेतूवर पोचतापोचताच अजून अर्धा तास निघून गेला. सेतूच्या मध्यावरून मुंबईचे विहंगम दृष्यसुद्धा पाहून झाले. अजून उशीर व्हायला लागला तसे स्वातंत्र्यवीर रथातून उतरले. सर्वदूर गाड्याच गाड्या पाहून त्यांना एकदम कोंडल्यासारखे वाटले. तास-दोनतास तरी काही सुटका नाही अशी चिन्हं दिसायला लागली तेव्हा स्वातंत्र्यवीरांची चलबिचल सुरू झाली. अंदमानचा अनुभव आणि जरा वय झाले तरी बांद्र्यापर्यंतचे २-३ किमी आपण सहज पार करू हा त्यांना आत्मविश्चास होता. ’सागरा, प्राण तळमळला’ असं म्हणत त्यांनी अरबी समुद्राच्या काळ्या पाण्यात स्वतःला (स्वातंत्र्यसमरात झोकून द्यावं तसं) झोकून दिलं आणि ते बांद्र्याच्या दिशेने पोहू लागले. ट्रॅफिकच्या अशा आधुनिक ’कारा’गृहाला आपले नाव नकोच नको असे सेनाप्रमुखांना सांगायचे अशी त्यांनी मनोमन खूणगाठ बांधली.

****
आपल्या नजरेसमोर एका वयोवृद्ध माणसाने समुद्रात उडी मारलेली पाहून राजीव गांधी एकदम चकित झाले. बांद्र्याच्या टोल नाक्याहून अंमळ फर्लांगभर पुढे येऊन ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या मोटारीतून तत्काळ पायउतार होऊन ते चटकन त्या दिशेने बघू लागतात तोच त्यांच्या अनंत सुरक्षारक्षकांनी, गनिमांनी प्रतापगडाला घालावा तसा त्यांना वेढाच घातला. लगोलग मागल्या-पुढल्या गाड्यांतून विविध मंत्री, खासदार, आमदार उतरले. इतक्या भारदस्त असामींच्या एकत्र पावलांमुळे राजीवजींना आपल्या नावाचा सेतूही क्षणभर हलल्यासारखा वाटला. पंचायती राजच्या अवलंबनानंतर काही वर्षांतच राजकीय शक्ती समाजाच्या (नैतिक) तळागाळापर्यंत पोचली आहे हे पाहून मनोमन तेही हलले.

(गाळात गेलेल्या) महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, त्यातल्या त्यात कमी खाणारे असल्याने, धावत धावत सगळ्यांत आधी राजीवजींजवळ पोहोचले.
"क्या हुआ राजीवजी?"
"हमने देखा की एक आदमी अभी-अभी समंदर में कूद गया! क्या आप के राज्य मैं अभीभी खुदकुशी का सिलसिला जारी है?"
एकदम गुगली आल्याने बावरलेल्या चव्हाणांना (क्रिकेटचे सर्वेसर्वा असलेल्या) कृषीमंत्री पवारांनी सावरले---
"नहीं नहीं! बारिश थोडी देर से आयेगी लगता है, लेकिन उससे पहलेही हमारी सरकारने पॅकेज जाहीर किया है, तो खुदकुशीका मामला नहीं हो सकता. कोई तैराती वाला खिलाडी होगा" शरदचंद्रांनी आपले हिंदी पाजळले.
पवारांना आय-पी-एल च्या खेळाडूंना मिळालेल्या (आणि विविध देणगीदारांकडून निवडणुकांनिमित्त घेतलेल्या) फायनॅन्शिअल पॅकेजच्या शिवायही काही माहीत आहे हे पाहून राजीवजी जरा खूष झाले. त्यांनी फर्मान काढले:
"चव्हाणजी, आप यहॉंपर सुरक्षा का ऐसा प्रबंध करें ताकी आयिंदा यहॉंसे कोई कूद ना पाये."
मूकपणे मान डोलवणाऱ्या चव्हाणांना बाजूला सारून राजीवजी पुढे चालू लागले. विपुल प्रमाणात खर्च करून उभारलेला, आपले नाव उंचावणारा, भारताचे तंत्रकौशल्य सिद्ध करणारा दिमाखदार पूल निरखत, विविध (राष्ट्रवादी, परराष्ट्रवादी आणि इतर) कार्यकर्त्यांमधून वाट काढत राजीवजी जरा पुढे येतात तोच "मुंबईच्या समुद्रसेतूला भूमीपुत्राचेच नाव हवे" असा मोर्चा त्यांच्याकडे येताना दिसला.

आपला जन्म मुंबईचा असल्याने हे नवीन पाठीराखे कोण आले ते बघणाऱ्या राजीवजींच्या सुरक्षारक्षकांनी संभाव्य धोक्याचा अंदाज घेऊन इतका वेळ वर घोटाळणारे हेलिकॉप्टर जरा खाली घेऊन त्यातून दोरी सोडली. राजीवजींनी ती धरून लगेचच वर चढण्य़ास सुरुवात केली. खाली सुरु होऊ घातलेली (घोषणांची) तुफान लढाई टाळून ते हेलिकॉप्टरमध्ये शिरले. आकस्मिक राजकीय प्रवेशानंतर पहिल्यांदाच मिळालेली संधी साधून त्यांनी हेलिकॉप्टरचा ताबा घेतला आणि ते नरीमन पॉईंट कडे वळवले. तेवढ्यात हेलिकॉप्टरच्या दिशेने एक तोफगोळा भिरभिरत आला....

****
दूर समुद्रातून आपल्या तोफगोळ्याचा ह्या उडणाऱ्या यंत्रावरचा नेम हुकलेला पाहून कान्होजी आंग्रे नाराज झाले. ह्या महाकाय पुलावर काय धुमश्चक्री चालली आहे ते पाहण्यास त्यांनी आपल्या नावा तिकडे हाकल्या.

"हरहर महादेव!" एकदम अशा आरोळ्या आलेल्या ऐकून आधुनिक सेनेचे नवकार्यकर्ते भांबावून गेले. ख-याखु-या तोफा आणि खरेखुरे मावळे समोर आल्यावर त्यांची पाचावर धारण बसली. आपल्या राजपुत्र-कम-(नव)सेनापतीला एकाकी सोडून त्यांनी पाण्यात उड्या टाकल्या.
"काय रे, काय चालू आहे इथे? माझे दोन तोफगोळे वाया गेले ना" एव्हाना कान्होजी नांगर टाकून एका घोरपडीच्या मदतीने पुलावर चढून आले होते.
"क्षमा असावी दर्यावर्दीश्रेष्ठ!"
"ए काय रे, श्या देतोस मला?" कान्होजींना ही नवमराठीतली उपाधी रूचली नाही.
"तसं नाही आम्ही या पुलाला आपले नाव द्यावे अशी मागणी करायला जमलो होतो."
"आमचे नाव? आणि या पुलाला? कशाला?"
"महाराजांच्या महाप्रचंड महाआरमाराचे नेतृत्त्व करणा-या महाशूराचा हा योग्य महासन्मान ठरेल असं आम्हाला दिलसे, जानसे आणि मनसे सुद्धा वाटतं" (राज) की बात एका सैनिकाने सांगितली.
"आमचा काय सन्मान करायचा तो महाराजांनी केलाच की. आता तुमच्यासारख्या महाभागांकडून आम्हाला असलं काही नको!"
"हो! आमचंही म्हणणं असंच होतं--- म्हणून आधुनिक स्वातंत्र्यवीराचं, महाराष्ट्राच्या भूमीपुत्राचं नाव आम्ही सुचवत होतो" ज्युनिअर ह्रुदयसम्राट बोलले.
"तसंच काही नाही, आमच्या थोर पूर्वजांनी मिळवलेल्या स्वातंत्र्य सुराज्यात बदलणा-या, मुंबईच्या पुत्राचं नाव द्यावं असं आम्ही म्हणत होतो!" घड्याळाचा टोला पडावा तसे कृषीमंत्र्यांचे एक चेले म्हणले.
"पूर्वी आम्ही मोगलांशी लढलो - अन्याय करणा-या जुल्मी बादशहाविरुद्ध रक्तं सांडलं. आता काय तुम्ही एकमेकांवरच अन्याय करताय की काय? काय एकेक लढतोय, वा!" इनका कुछ खरा नाही या आविर्भावात डोकं हलवून कान्होजी कडाडले.
"हे आम्ही चाललो. महाराजांचा विजय असो!"
इतकं बोलून कान्होजीं पुन्हा आपल्या जहाजाकडे निघाले.

"अहो पण मग या पुलाच्या नावाचा प्रश्न सोडवायचा कसा???"
"आधी या भयंकर रहदारीचा प्रश्न सोडवा. बघा किती माणसं अडून बसली आहेत. महाराजांच्या काळात असं नव्हतं. असं राह्यलं असतं तर मोगलांशी लढायला महाराज पोचलेच नसते. सगळी घोडी तिथेच अडली असती. काय कळलं??"

आजूबाजूच्या जनतेने "पॉ पॉ!!!" हॉर्नच्या आवाजांनी कान्होजींना अनुमोदन दिले. तेव्हा कुठे इतका वेळ रस्त्याच्या बरोबर मधे झोपा काढत असलेल्या राजकारण्यांना जाग आली.

****
दूर बांद्र्याच्या किना-यावर आत्ताच पोचलेले स्वा. सावरकर, हेलिकॉप्टरमधून दक्षिण मुंबईत पोहोचलेले राजीवजी आणि अरबी समुद्राच्या खोल पाण्यात पोहोचलेल्या नौकेचे शूरवीर कप्तान या सगळ्यांनी एकाच वेळी हुश्श केलं. आणि साधारण त्याच सुमारास इतका वेळ आपल्या अंगावर झेललेला ट्रॅफिक मोकळा झाला हे पाहून आपल्या मुंबईच्या सी-लिंकने सुद्धा!


-अजित ओक आणि मिहिर महाजन

(क्षमस्व: तंबी दुराई)

३ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

Good one but with Factual Errors: Kanhoji and Shivaji timelines don't match.. Besides Kanhoji's name is suggested by communists.. not by any of the senas.. http://beta.esakal.com/2009/07/01192433/vidarbha-mumbai-cpi-suggest-ka.html And Savarkar's name is suggested by Shivsena.. http://beta.esakal.com/2009/07/01212015/mumbai-mumbai-shivsena-given-s.html

Nile म्हणाले...

haa haa! sundar! mastach! :)

Dk म्हणाले...

wawa ;ai bhaaree :)