भिंत खचली कलथून खांब गेला
जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला
तिच्या कौलारी बसुनि पारवा तो
खिन्न नीरस एकांतगीत गातो
सूर्य मध्यान्ही उभा राहे
घार मंडळ त्याभवती घालताहे
पक्षी पानांच्या शांत सावल्यांत
सुखे साखरझोपेत पेंगतात.
तुला नाही परि हौस उडायाची
गोड हिरव्या झुबक्यात दडायाची
उष्ण झळ्या बाहेर तापतात
गीतनिद्रा तव आंत अखंडित
चित्त किंवा तव कोवळ्या विखारे
दुखतेखुपते का सांग सांग बा रे
तुला काही जगतात नको मान
गोड गावे मग भान हे कुठून
झोप सौख्यानंदात मानवाची
पुरी क्षणही कोठून टिकायाची
दुःखनिद्रे निद्रिस्त बुध्दराज
करूणगीते घुमवीत जगी आज.
दुःखनिद्रा ती आज तुला लागे
तुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगे
फिरे माझ्या जगतात उष्ण वारे
तुला त्याचे भानही नसे बा रे.
-बालकवि
या पूर्ण कवितेत, एक जळजळीत उन्हाळा सतत जाणवत राहतो. एक जुनी पडकी - इमारत, वर ऊन तळपते आहे, पटांगणावरुन चमकणारा प्रकाश डोळ्यांना सहन होत नाहिये. आणि अशा वातावरणात, एक पारवा - पारवा हा काही रंगीबेरंगी पक्षी नव्हे - गोड गाणारा तर नाहीच - एकटाच बसून खिन्न नीरस केविल'गाणे' गातोय.
अशा उन्हाळ्यातल्या एखाद्या दुपारी, शुद्ध सारंग ऐकावा - सारे चित्र कसे झटक्यात डोळ्यांसमोर उभे राहिल.
पारवा हे माझ्या मते प्रतीक आहे, अशा भकास वातावरणाचे (अशा वातावरणात पिसारा फुलवून नाचणारा मोर शोभेल का?!) त्यातच कविचे मनही असेच खिन्न - दुःखी. कविच्या जगात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्याबद्दलची पारव्याची बेफिकिरी कविला आणखीच दुःखी करून जाते आणि मग उमटतात ते हे सारे शब्द!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा