मंगळवार, ऑगस्ट ०९, २००५

"Let the world change you,
and you will change the world"


यातल्या दुसऱ्या भागाबद्दल शंका वाटत असली तरि पहिला भाग अनुभवायला काहिच हरकत नाही.

IISC सोडल्यानंतर Intel मध्ये रुजू होईपर्यंत मधे दोन आठवड्यांचा पूर्णत: रिकामा वेळ हाती लागला, आणि मग उत्साहाने त्या दरम्यान हिमालयाच्या trek चा बेत आखला गेला. १९९८ मध्ये मी-आई-बाबा-स्नेहल नैनीतालला गेलो होतो. रानीखेत-कौसानीहून हिमालयाचे दर्शन घडले होते. यावेळेस मात्र Valley of Flowers आणि हेमकुंड साहिब अशी प्रत्यक्ष हिमालयावरच स्वारी होणार होती. संपूर्ण प्रवासाची diary अशी वेगळी लिहिली आहेच.आलेल्या अनुभवांवर काहिशी टिप्पणी :

- रेल्वेचा प्रवास मला नेहमीच आवडत आलेला आहे. प्रवासात जो काही शांतपणा (मनाला,प्रत्यक्षात नव्हे) मिळतो तो फारच हवाहवासा वाटतो. प्रवासात डोक्यात चाललेले विचार हे मात्र फारच volatile असतात. प्रवास संपल्यानंतर फारसं आठवत नाही; मात्र एकंदरीत स्वतःमध्ये फरक पडलेला असतो हे नक्की.

- प्रवासातला सहप्रवासी हा साधारणपणे एक संशोधनाचा विषय आहे. काही जणांना प्रत्येक-अगदी लहानसहान गोष्टींवर comment करण्याची सवय असते. आणि या comments बहुतेक वेळा कुचकटच असतात. माझा अशा लोकांबरोबरचा संयम बऱ्याचदा तोकडा पडतो. बंगलोर-दिल्ली प्रवासातल्या सहप्रवाश्याने माझी चांगलीच परीक्षा घेतली.

- असा लांब पल्ल्याचा प्रवास करतान आपला देश किती विस्तीर्ण आणि विविधता असलेला आहे याची प्रकर्षाने जाणीव होते. एका रात्रीत हवामान बदलते. निघालो तेव्हा बंगलोर आणि परिसरात अजिबातपाऊस नव्हता. दुसऱ्या दिवशी आंध्र प्रदेशात नद्यांना पूर आलेले दिसत होते. तिसऱ्या सकाळी मध्य प्रदेशातही बराच पाऊस लागला. दिल्लीतच त्या मानाने कमी पाऊस होता. २५०० किलोमीटर्सच्या प्रवासानंतरही अजून उत्तरेला हिमाचल-पंजाब-काश्मीर उरलेले होतेच. यावेळेस विदर्भात जाण्याचा योग आला. नागपूर-चंद्रपूर-वर्धा अशी स्टेशने लागली.

- इतके प्रचंड अंतर कापण्याऱ्या रेल्वेला बऱ्याचशा transitions मधून जावे लागते. बंगलोरला काऽऽफी पासून महाराष्ट्रात चहाऽऽ चहाऽऽ ते मध्य-उत्तर प्रदेशात कुल्हड में गरमचाऽऽय अशा आरोळ्या ऐकू येतात. प्रवासी आणि आगगाडी तीच असते. शहरे मागे पडत असतात.

- general, sleeper class ते A/C, first class अशा निरनिराळ्या डब्यांतून प्रवास करणाऱ्यांना आपल्या नियोजित स्थळी पोहोचवणारे engine मात्र एकच असते.engine ला अपपरभाव मुळीच नसतो. माझ्या आठवणीप्रमाणे पुलंनी याविषयी एका लेखात भाष्य केलेलं आहे.

- जगातील सर्वात मोठी organisation असलेल्या भारतीय रेल्वेचा सुरळीत कारभार हे एकफार मोठे आश्चर्य आहे. निव्वळ प्रवासाचे माध्यम अशा द्रुष्टीने याकडे बघितल्यास या कारभाराचीअवाढव्यता लक्षात येणार नाही. मालगाड्या, प्रवासी गाड्या, पॅसेंजर गाड्या, त्यांची आगाऊ आरक्षणे, signaling, आणि रोजची लहानतल्या लहान स्टेशनांवरची 'routine' कामे हे काम नसे थोडके...

- Cloak room ही केवढी उपयुक्त सेवा आहे याची जाणीव दिल्ली स्टेशनावर झाली. तिथे सामान ठेवून आम्ही अक्षरशः जीवाची दिल्ली केली. दिल्लीची metro-rail आवडली. विशेषतःकलकत्त्याचा अनुभव आठवणीत ताजा असल्यामुळे यावेळी अधिकच मजा आली.

- "रेल्वे वेळेवर धावतात" या नियमामुळे किती सुविधा होते याची जाणीव फक्त एका आठवड्यातच आम्हास होणार होती. पंचाईत होत नाही तोपर्यंत एखाद्या गोष्टीचे महत्त्व कळत नाही. चालून चालून प्रचंड थकल्यावर एक सायकलसुद्धा विमानस्वरूप भासते.

- रेल्वेचा खूप लांबचा प्रवास करूनही प्रवासाचा थकवा जाणवत नाही. बंगलोर-दिल्ली ३२ तासांच्या प्रवासानंतर आम्ही लगेचच देहरादूनच्या गाडीत बसलो - खरं तर झोपलो. सकाळ झाली तेव्हा भारताच्या विविधतेचं आणखी एक रूप समोर आलं. क्षितिजापर्यंत एकही डोंगर किंवा टेकडी नाही, हिरवीगार शेते आणि त्यांना छेदून जाण्याऱ्या फेसाळत्या, प्रचंद नद्या असं रूप आता निसर्गाने धारण केलं होतं. मका आणि उसाच्या शेतीत पॉपलरच्या झाडांनी नेटके plots पाडलेले दिसत होते. नदिच्या पात्रात नर्मदेतल्या गोट्यांसारखे रंगीत गोटे प्रचंड प्रमाणात दिसत होते. single trackअसल्याने आमच्या train ला देहरादूनला पोहोचण्याची काहीच घाई नव्हती. आणि बाहेरचं द्रुष्यपाहण्यात गुंग झालेल्या आम्हालाही!

- देहरादुन हे अपेक्षेप्रमाणेच एक थंड (हवेचं) शहर निघालं. थोडासा पाऊस पडत होता, हवेत गारठाही चांगलाच होता. हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांनाही थंडी भरली असावी - सगळी कामं थंडावली होती. थंड हवा आणि त्यात पाऊस यामुळे सगळीकडे हिरवाई होती. दक्षिण भारत आणि उत्तर भारत आणि आता उत्तरांचल यांच्यातले फरक आता पदोपदी जाणवत होते.

- खूप मोठ्या break नंतर करायला मिळणारी आंघोळ हा सुंदर अनुभव असला तरी तो काही असा break घेण्यासाठी उद्युक्त करत नाही, ही एक चांगली गोष्ट आहे :)

- एखाद्या व्यक्तिचा आवाज आणि बोलण्याची लकब यावरून त्याच्या दिसण्याचा- पेहरावाचा केलेला अंदाज किती चुकू शकतो याचा प्रत्यय आला. आमचे गाईड मधवलजी यांच्याशी फोनवर बोलणं झालेलं होतं, त्यावरून ही व्यक्ती बुटकी, सफारी सूट, पान चघळणारी असावी असा आम्ही तर्क केला होता. प्रत्यक्षात मधवलजी सहा फूटांहून जास्त उंच, धिप्पाड आणि चक्क jeans मध्ये वावरणारेनिघाले!

- IISc ही मी आत्तापर्यंत पाहिलेली सर्वांत हिरवीगार Institute होती. देहरादूनमधल्या Forest Research Institute ने सगळे निकष बदलून टाकले. नजर पोहोचेल तिथपर्यंत हिरवळ आणि क्षितिजावर शिवालिक पर्वतरांगा! प्रत्येक व्रुक्षाचा निराळा हिरवा रंग, अत्यंत सुंदर आणि देखणी इमारत ही आणखी वैशिष्ट्ये सांगता येतील. मुख्य रस्त्याच्या बाजूला प्राध्यापकांची घरे आहेत.प्रत्येक घरासमोर बाग -नव्हे, चक्क शेती आहे. एका घरासमोरच्या शेतीत भाताची लावणी चाललेली आम्ही पाहिली. प्रत्यक्ष institute मध्ये पाच वनसंग्रहालये आहेत - त्यात सामाजिक वनिकरण, इत्यादी संशोधनावरची बरीच माहिती प्रदर्शित केलेली आहे. लाकडांचे उपयोग, वनौषधी, झाडांना होणारे रोग, वनांची शास्त्रीय पद्धतीने तोडणी, पुनर्लागवड, वनांतले कीटकजीवन इ. अनेक गोष्टींवर संग्रहालयात विभाग आहेत. सदैव computer-electronics वर डोके लढवणाऱ्या आम्हांसहा अनुभव सुखद आणि थक्क करणारा होता.

- या अवघ्या परीसरात लक्ष वेधून घेतात ते क्षितिजावरचे डोंगर - पर्वतरांगा. नुकताच पाऊस पडून गेलेला असल्यामुळे हवा स्वच्छ होती. पांढरेशुभ्र ढग हलक्या झुळुकेबरोबर तरंगत होते. एकूणच वातावरणातला तजेला आणि चैतन्य वर्णन करण्यासारखं होतं - आणि मनातलही!

- डोक्यावर कुठल्याही प्रकारचं ओझं नसण्याचे ते काही दुर्मिळ दिवस होते. आणि तिथलं वातावरणही असं होतं की, नजिकच्या भविष्य/भूतकाळातल्या दगदगीची आठवण होणं शक्यच नव्हतं. अधूनमधून जाणीव होत होती की हे सारं क्षणिक आहे. थोड्याच दिवसांत काम-नोकरीच्या पसाऱ्यात आपल्याला हरवून जायचं आहे.

- मी काही फार साहसी आहे असं नाही. मात्र माझ्या मर्यादेत मला स्वतःला test करायला आवडतं. आता मी train/बसच्या प्रवासाला कंटाळलो होतो. डोंगर मला खुणावत होते, माझं उत्तर येणाऱ्या प्रतिध्वनीत मिसळून जात होतं.

- देहरादून ते जोशीमठ हे अंतर रस्त्याने पाहिलं तर ३०० किमी आहे; पण नकाश्यावर trace केलं तर माझी खात्री आहे, सरळ रेषेतलं अंतर त्याच्या निम्मं असणार. ९०% रस्ता म्हणजे एक अखंड घाट आहे.

- लहानपणी - लहानपणीच काय, अगदी आत्ता-आत्तपर्यंत हरीद्वार, ह्रुषिकेश, केदारनाथ-बद्रिनाथ ही ठिकाणं फार म्हणजे फार दूर आहेत असं वाटायचं. मात्र उत्तरांचलात पोहोचलो आणि ही सगळी तीर्थक्षेत्रं फारच जवळ आली.

- गंग नदीचं खरं रौद्र स्वरूप दिसलं ह्रुषिकेशमध्ये. उगमापासून त्या मानने खूपच कमी अंतरात गंगानदीचा विस्तार प्रचंद वाढलेला दिसतो. पुराचं प्रचंड, गढूळ पाणी वेगाने वाहताना दिसत होतं. एक नदी एखाद्या देशाच्या अर्थ-समाज आणि संस्क्रुती कारणात केवढी महत्त्वाच्यी असते हे विचार करण्यासारखं आहे. एक गंग नदी जर नसती, तर केवढा फरक पडला असता याचा अंदाज गंगेचंहे विशाल दर्शन घेतल्यावरच आला.

- हिमालयाच्या या पायथ्याजवळच्या पर्वतराजीत रस्ते बांधणं हे एक महाकठीण काम आहे. एक तर डोंगरांच्या size मुळे बोगदे काढणं economical नाही, त्यामुळे घाटरस्ते खूप जास्त लांबीचे बांधावे लागतात. नद्यांवर पूल बांधणं अशक्यप्राय आहे - त्यामुळे नदी ओलांडण्यासाठी उतरत उतरत नदीच्या त्यातल्या त्यात चिंचोळ्या भागाजवळ यावं लागतं. त्यानंतर छोट्या पुलावरून नदी पारकरून मग रस्ता पुन्हा डोंगर चढू लागतो. रस्ते बांधतान विविध प्रकारच्य वाहनांचा, त्याच्या क्षमतेचा किती विचार करावा लागत असेल हे इथं जाणवतं.

- देहरादून ते जोशीमठ सगळा रस्ता उजव्या बाजूला दरीत नदी आणि डाव्या बाजूला उंचच्या उंचडोंगर-बहुतेक झाडांनी आच्छादलेले असा आहे. महाराष्ट्रातल्या घाटांशी तुलना केली तर अतिप्रचंड उंचीआणि सगळीकडे जंगल अशा दोन गोष्टी हिमालयात प्रकर्षाने दिसून येतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: